
बहीण बघते भावाची वाट
ओवाळणी कराया सजले ताट
बहरून आली श्रावण पौर्णिमा
दिसता बहीण सुखी झाला चंद्रमा
भाऊ उभा बहिणीच्या पाठीमागे
चमचम राख्या हातावर फुलती
बहिणी येऊन माहेरात रमती







शिक्षणाच्या बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्ततेसाठी..
शिक्षण हा आज घडीला जीवनाचा मुलभूत घटक समजला
जातो. बऱ्याच पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता सतत भेडसावत असते. आपल्या
मुलांच्या शिक्षणाच्या काळजीचा फायदा घेऊन आजपर्यंत बऱ्याच नामांकित खाजगी शिक्षण संस्थांनी
आपल्याला खूप लुटले आहे आणि लुटत आहेत. खरे पाहता या खाजगी शिक्षण संस्थामधून बाहेर
पडणारा विद्यार्थी शासकीय शाळेतून बाहेर पडणाऱ्या विघ्यार्थ्यापेक्षा फार काय तर थोड्या
चांगल्या प्रमाणात इंग्रजी बोलू शकतो आणि थोडाबहुत नीट नेटका राहून अधिकचे
इम्प्रेशन झाडू शकतो.
मला इथे असे सांगावेसे वाटते जर पालक
कुठल्याही ग्वाही शिवाय या खाजगी शिक्षण संस्थांनी आकारलेली अवाढव्य फीज भरून
आपल्या पाल्यांना शाळांमध्ये दाखल करण्यास तयार होत असतील तर मग त्यांनी हीच
मानसिकता सरकारी शाळेबाबत दाखवायला काय गैर आहे. म्हणजे उदा. महाराष्ट्र राज्याचे
शिक्षण खाते आग्रह धरत असेल की शासनाच्या शाळेत मुलांना शिकवा तर काय हरकत आहे. तुम्ही
म्हणाल शासनाच्या शाळेत शिक्षण हे विनामूल्य असते इथपर्यंत ठीक आहे परंतु तेथे
शिक्षणाचा आणि सुविधांचा दर्जा म्हणावा तेवढा जोपासलेला नसतो. मान्य ! परंतु यावर
एक चांगला उपाय आपण पालक आणि शासन मिळून राबवू शकतो. तो म्हणजे शासनाने उच्च दर्ज्याच्या
पुरेश्या प्रमाणात शासकीय शिक्षणसंस्था उभाराव्यात. तसेच शिक्षणाचा दर्जा उंचवायचा असेल तर, आर्थिक बाजू अधिक
भक्कम असावी लागते हे आपण पालकांनी देखील समजून घेऊन थोड्या प्रमाणात फीज च्या
स्वरुपात शासनाला मदत केली पाहिजे.
आपल्याला शिक्षणाचे खाजगीकरण फार महाग पडत
आहे. आयुष्यभराची सर्वं कमाई पालक फक्त आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करत आहेत.
त्यामुळे फक्त खाजगी शिक्षण संस्थांचे मालक अधिक धनाड्य बनत चालले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे. मोठ्या
मोठ्या शहरामध्ये तर खाजगी शाळांच्या फीज भरून भरून बरेच पालक अघोषित आर्थिक आणीबाणी
उपभोगत आहेत. आपल्याला राज्याचा कायापालट करायचा असेल तर शिक्षणाचे वाढते खाजगीकरण
त्वरित थांबविले पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जात असतांना शासनाला फक्त मराठी
शाळांचा किंवा विषयाचा आग्रह धरून चालणार नाही तर काळाबरोबर बदलावे देखील लागेल.
खाजगी शिक्षण संस्थांच्या वरच्या दर्ज्याच्या मुबलक शाळा जागो जागी उभाराव्या
लागतील आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांचा देखील कायापालट करावा लागेल.
शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाचा घटक शिक्षक
असतो म्हणून शासनाने त्यांची निवड करतांना कडक शैक्षणिक पात्रतेसह बौद्धिक आणि
मानसिक निकस लावणे देखील तितकेच गरजेचे आहे हे समजले पाहिजे. एक शिक्षक फक्त
बारावी पास करून डिप्लोमा केलेला नसावा तर तो उच्च विद्याविभूषित व मुलांच्या भवितव्याचा
आत्मीयतेने विचार करणारा असावा. त्याच्या मध्ये शिकविण्याची कला अत्यंत प्रभावी व
प्रगत असावी आणि शासनाने वेळोवेळी त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीचे अवलोकन करून आवश्यक
ते बदल करून घेतले पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने मनावर घेतले आणि माझ्या
महाराष्ट्रातील सर्वं पालकांनी शासनाच्या पाठीशी उभे राहून आपल्या पाल्यांना शासकीय
शाळेत दाखल करण्याचे धाडस दाखविले पाहिजे, जेणेकरून लुटमार करणाऱ्या धनाड्य शिक्षण संस्थांना चांगली
चपराक बसेल. तसेच यातून आणखी एक महत्वाची गोष्ट देखील साध्य होईल ती म्हणजे शासनाच्या
नौकरयामध्ये कमालीची वाढ.
उच्च दर्जाचे शिक्षक, सर्वं सुख सुविधांनी
सज्ज शासकीय शिक्षण संस्था, अघ्यावत अभ्यासक्रम, अत्याधुनिक उपकरणे आणि अभ्यासा व्यतिरिक्त
खेळ, व्यायाम व सर्वांगीण विकास यावर भर देणारी शिक्षण पद्धती ही महाराष्ट्राच्या
उज्ज्वल भविष्याचे गणिक ठरू शकते. सोबतच हे सर्वं साध्य होत असतांना पालकवर्ग
कुठल्याही मानसिक दडपणाखाली येणार नाही याची पुरेपूर दखल घेणारा शिक्षण विभाग व मंत्री
लाभणे देखील महत्वाचे. शासन, पालक व शिक्षक यांच्या प्रयत्नातून आपण शिक्षणाचे
खाजगीकरण व त्यातून निर्माण झालेले बाजारीकरण थांबवू शकतो आणि ते थांबविलेच पाहिजे
जेणेकरून येणाऱ्या पिढ्या शिक्षणाच्या
बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्तता होऊन दडपण विरहित, समानतेची शिक्षण
पद्धती निर्माण होईल.
जय महाराष्ट्र..!
-
राणी अमोल मोरे
अनुवांशिकता आणि परिवर्तन
मनुष्यामध्ये शारिरीक आणि मानसिक गुणदोष काही प्रमाणात अनुवांशिकतेमुळे मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत स्थलांतरित होत असतात. शारीरिक गुणदोषांचा विचार करता लांब केस आईकडून मुलीकडे, कानावर लांब केस वडिलांकडून मुलांमध्ये तसेच काही शारिरीक आजार जसे की मधुमेह, दमा इत्यादी. आणि मानसीक गुणदोषांमध्ये भावना, बाणेदारपणा, चटकन राग येणे, हुशारी, समजुतदारपणा, समाजाबद्दल आदर या गोष्टींचा अंतरभाव करता येईल.
एखाद्या कुटुंबातील सर्वं व्यक्तींच्या गुणदोषांचा विचार करता त्या कुटुंबाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली अनुवांशिकता सहज समजता येते. परंतु, शारिरीक दृष्ट्या सोडलं तर मानसीक दृष्टया अशा प्रकारची अनुवांशिकता पिढयानपिढया स्थलांतरीत करण्याचे काम काही समाज घटक देखील करीत असतात. जसे की शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, समाजिक संस्था, प्रत्येक समाज, धर्म संप्रदाय, गावे, शहरे, तालुका, जिल्हा, राज्य विभाग¸ प्रांत देश इत्यादी. मनुष्याच्या अवती-भवती असलेल्या सर्व बाबी मानसीक अनुवांशिकतेला कारणीभूत ठरतात. कळत न कळत मनुष्याच्या मनाची मानसीकता या सर्व बाबींवर अवलंबून असते. हे सर्व कशाप्रकारे प्रभाव टाकते याचा आपण अभ्यास केला तर हे लक्षात येते की, जर एखादी शिक्षण संस्था (शाळा, महाविद्यालय) वर्षानुवर्षे एकाच पध्दतीने शिक्षण पिढयांनपिढ्यांना पूरवत असेल तर त्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणा-या ब-याच विध्यार्थ्यांमध्ये त्या संस्थेच्या शिक्षणाच्या पध्दतीचे ठसे उमटलेले दिसतात. ते असे की ती शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी झटत असेल तर तेथील बरेच विद्यार्थी सर्वांगाने विकसीत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याउलट जर एखाद्या शिक्षण संस्थेत शिक्षणाचा अपूरेपणा असेल तर तेथील विद्यार्थी पुढे जाऊन स्वत:च हे सिध्द करतात. अशा प्रकारे ह्या शिक्षण संस्था कशा आहेत याचे विश्लेषण आपण तेथील विद्यार्थ्याच्या गुणदोषावरुन करु शकतो. थोडक्यात हे जर वर्षानुवर्षे अन पिढयानपिढया असंच चालत राहिलं तर त्या संस्थेची तेथील शिक्षणाची अनुवांशिकता त्या विद्यार्थीमध्ये आलेली असते. हे झाले शिक्षणाच्या बाबतीत,
आता सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, समाज त्या त्या समाजातील धर्म आणि संप्रदाय पाळण्याच्या पध्दती या सर्व गोष्टींचा विचार केला तर ह्या देखील शिक्षण संस्थे सारख्याच जबाबदार आहेत. जर एखादा समाज पिढ्यानपिढया शिक्षणाला, स्त्री-पुरुष समानतेला, नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याला मान्यता देत असेल तर हीच अनुवांशिक मानसिकता पिढयानपुढ्या त्या समाजातील लोकांमध्ये उतरत जाते व कालांतराने त्या समाजाची प्रगती होत राहते. या उलट, जर एखादा समाज हा धार्मिक रूढी, परंपरा व जुन्या बुरसटलेल्या गोष्टीला अंधश्रध्देला थारा देत असेल तर येणा-या पिढ्यांमध्येही तीच अनुवांशिकता दिसुन येईल व त्या समाजाची अधोगती होण्यास कारणीभूत ठरेल.
गाव, शहर, प्रांत, तालुका, जिल्हा राज्य आणि देश अशाच प्रकारची अनुवांशिकता दर्शवित असतात. जर एखादे छोटेशे गाव हे स्वच्छतेला आग्रही धरुन विकास करत असेल तर ती अनुवांशिकता तेथील लोकांमध्ये दिसुन येते. एखाद्या शहरामध्ये रहदारीचे नियम योग्य प्रकारे पाळण्याची अनुवांशिकता असेल तर त्या शहरातील नागरिक इतर शहरात गेल्यावरही आपली रहदारीची अनुवांशिकता दर्शवतात. त्याचप्रकारे एखादे राज्य, प्रांत नवनवीन तंत्र ज्ञानाला उद्योग–धंद्याला पुढाकार देत असतील तर तेथील जनसंख्या आपल्या या अनुवांशिकतेने आपला वेगळा ठसा उमटवतात. संपुर्ण देशाचा विचार करता भारतीय लोक हे जर गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळविलेले किंवा संशोधनात नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता सीध्द करत असतील तर ते देखील भारत देशाची अनुवांशिकताच इतर देशात गेल्यावर प्रभावीपणे दर्शवीतात. जर भरतीय लोक विना कारण बडबड करण्यात वेळ वाया घालवत असतील, तर ती देखील देशाची अनुवांशिकताच म्हणावी लागेल.
यावरुन हे सिध्द होते की, कुठल्याही कुटुंबाची, समाजाची, शिक्षण संस्थेची, धर्म संप्रदायाची, गाव, शहर, प्रांत, राज्य आणि देशाची माहीती ही तेथील मनुष्याने पिढयानपिढया दर्शविलेल्या गुणदोषावरुन मिळविता येते. शारीरिक अनुवांशिकता वगळता मानसिक अनुवांशिकता बदलने कठीन जरी असले तरी अशक्य नाही. गरज आहे ती फक्त परीवर्तनाची, पिढयानपिढ्या चालत आलेल्या दोषांना बाजूला सारुन मानव विकासासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भवितव्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे अवलोकन करुन ते स्वत:मध्ये रुजवून वेळोवेळी त्यात योग्य तसा बदल घडवून आणण्याची व टिकवून ठेवण्याची. सोबतच अनावश्यक अ-प्रगतीकारक गोष्टीला बाजूला सारून मुळासगट उच्चाटन करण्याची. म्हणजे त्या वाईट गोष्टी अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत स्थलांतरीत होणार नाहीत व फक्त योग्य गोष्टीच वाढत जाऊन अनुवांशिकतेणे परिवर्तन येऊन मानव जातीचा पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम जरी असला तरी अनुवांशिकतेने परिवर्तन हा देखील एक नियम होऊ शकतो.
- - राणी अमोल मोरे